
गद्दार किंवा देशद्रोही वक्तव्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही..?
न्यायालयाने माफी मागायला सांगितली तरच माफी मागेन.
*कॉमेडीयन कुणाल कामरा.मुंबई : विराम पवार
मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी आपल्या युट्यूब चॅनेलवर ‘नया भारत’ नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यात त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.
यात त्याने काही बॉलिवूड गाण्यांचा आधार घेत पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जहरी टीका केली आहे.
या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी होत आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर कॉमेडियन कुणाल कामराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नसल्याचे त्याने सांगितलं. ज्या ठिकाणी त्याचा कॉमेडी शो रेकॉर्ड झाला, त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीवर देखील त्याने टीका केली. मी जे बोललो, तेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बोलले होते, मी काहीही वेगळं बोललो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं कुणाल कामराने सांगितलं.
कामराने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जिथे तोडफोड झाली ते मनोरंजन स्थळ केवळ एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या शोसाठीची ती एक जागा आहे. माझ्या कॉमेडीसाठी कोणतंही निवासस्थान (किंवा इतर कोणतेही ठिकाण) जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचे कोणतेही अधिकार किंवा नियंत्रण नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष हे करत नाही. एखाद्या कॉमेडियनने केलेल्या वक्तव्यासाठी एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे म्हणजे बटर चिकन न आवडणाऱ्या व्यक्तीने टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटवण्यासारखा मूर्खपणा आहे.